पत्नी हरविल्याची तक्रार देणारा पतीच निघाला खुनी   

तब्बल तीन महिन्यांनी पती व मित्राला अटक

इंदापूर, (वार्ताहर) : इंदापूर तालुक्यात पत्नीेवर चारित्र्याचा संशय घेत पतीने तिचा गळा आवळत तिची हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.  पतीने पहिल्यांदा पत्नीला संपवले आणि नंतर पत्नीचा मृतदेह नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील घाटात सुमारे दीडशे फुट खोल दरीमध्ये फेकला. त्यानंतर बायको हरवल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दिली. मात्र, तब्बल तीन महिन्यानंतर पोलिसांनी या मृत्यूचे गूढ उकलले आहे.
 
बायकोवरती चारित्र्यावर संशय घेत पतीने तिचा गळा आवळत तिची हत्या केली, त्यानंतर तिचा मृतदेह इंदापुरपासून जवळपास तीनशे किलोमीटर अंतरावर असणार्‍या नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील घाटात सुमारे दीडशे फुट खोल फेकत बायको हरवल्याची तक्रार या नराधम पतीने इंदापूर पोलिसांत दिली. मात्र, तब्बल तीन महिन्यानंतर पोलिसांनी या मृत्यूचं गूढ उकललं आहे. इंदापूर तालुक्यातील चितळकरवाडी येथील प्रियंका शिवाजी चितळकर हिचा २०१३ साली इंदापूर तालुक्यातील कळाशी येथील ज्योतीराम करे याच्याशी विवाह झाला होता.
 
दरम्यान मागील काही महिन्यांपासून ज्योतीराम करे याचा पत्नी प्रियंकाच्या चारित्र्यावर संशय होता. यातून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. त्यानंतर २९ जानेवारी रोजी ज्योतीराम करे यानं इंदापूर पोलिसात आपली बायको हरवण्याची तक्रार दाखल केली होती. प्रियंका करे हरवल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर इंदापूर पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र, ही महिला हरवली नाही तर तिचा खून झाला असावा, असा संशय इंदापूर पोलिसांना वाढला आणि पोलिसांनी त्या दृष्टीने आपला तपास सुरू केला.
 
ज्योतीराम करे हा सातत्याने पोलिसांना खोटी माहिती देण्याचा प्रयत्न करत होता. शेवटी पोलीस त्याला घेऊन नाशिकच्या नांदगाव परिसरातील डोंगर घाटात पोहचले आणि दीडशे फूट खोल दरीत फेकलेला कुजलेल्या अवस्थेतील प्रियंका सांगाडा पोलिसांनी बाहेर काढला. करे हा साखर कारखान्याला ऊस पुरवठा कामी ट्रॅक्टर चालवतो. त्यामुळे त्याला या परिसराची चांगली माहिती होती. आपल्या आणखी एका मित्राच्या सहाय्याने त्याने नांदगावच्या डोंगरदरीत प्रियंकाचा मृतदेह फेकला. याप्रकरणी इंदापूर पोलिसांनी ज्योतीराम करे आणि दत्तात्रय गोलांडे या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.

Related Articles